औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाईन – सरकारने बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली केली. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ४ डिसेंबर रोजी या संदर्भातील आदेश जारी केला. त्यांनी आपल्या कामकाजाची सुरवात अगदी दणक्यात केली आहे. प्लास्टिक बंदी असताना, प्लास्टिक लावून पुष्पगुच्छ आणल्यामुळे आस्तिक कुमार पांडे यांनी स्वागताचा पुष्पगुच्छ देणाऱ्या अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर औरंगाबादचे महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक दिवाळीसाठी प्रदीर्घ रजेवर गेले. परंतु ते पुन्हा रुजू न झाल्याने महापालिकेत प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली होती. परिणामी विकास कामं ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांची औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून बदली केली. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी 4 डिसेंबर रोजी या संदर्भातील आदेश जारी केला.
आस्तिक कुमार पांडे आज औरंगाबाद महापालिकेत रुजू झाले आहेत. त्यावेळी त्यांना शुभेच्या देण्यात आल्या. नगररचना विभागाचे प्रमुख आर एस महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. परंतु या बुकेला प्लास्टिक लावलं होतं. राज्यात प्लास्टिक बंदी असतानाही, पुष्पगुच्छाला प्लास्टिक लावलेलं आढळलं. यामुळे नव्या मनपा आयुक्तांनी जागेवरच रामचंद्र महाजन यांच्याकडून पाच हजार रुपयांचा स्पॉट फाईन वसूल करण्याचा आदेश दिला.
Visit : bahujannama.com