सातारा : बहुजननामा ऑनलाइन – माण तालुक्यात नेहमीच दुष्काळी परिस्थिती असते. या दुष्काळाचा सामना करीत म्हसवड येथील कक्कया समाज हा काबाडकष्ट करीत आहे. या समाजासाठी आमच्या सरकारने अनेक योजना राबवल्या होत्या. त्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील समाजाला होत नसल्याने आजही त्यांचे अनेक प्रश्न व मागण्या प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण राज्यासह केंद्राकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिले. शिंदे यांनी येथील उद्यमनगराला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, राज्यात कक्कया समाजाचे प्रश्न आहेत. हा समाज अत्यंत सोशिक असल्याने घाणीत काम करतो आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे, यासाठी काँग्रेस पक्षाने अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील माझ्या समाजबांधवांना होत नाही. यापुढे आपण या समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा पुनरुच्चार केला. यावेळी कक्कया समाजाच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त सर्व समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी माजी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय सोनवणे, आर.पी.आय.चे किशोर सोनवणे, मोतीलाल खंदारे, दिनकर सोनवणे, दाजीराम खंदारे, पांडुरंग सोनवणे, रवींद्र कदम, नंदकुमार सोनवणे, सचिन शिंदे, संतोष शिंदे, बापू सदाफुले, रामभाऊ सोनवणे, भारत खंदारे आदी प्रमुख उपस्थित होते.