मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप येत्या एक-दोन दिवसांत होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तूर्त गृहखाते राहणार आहे. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कामकाजाच्या सध्याच्या परिस्थितीचा अहवाल मागून घेतला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. तसेच पुढील एक दोन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळाचा शपथविधी २८ नोव्हेंबरला झाला. त्यावेळी उद्धव यांच्यासह सात जणांनी शपथ घेतली होती. मात्र अजूनही खातेवाटप होऊ शकले नाही. आजच्या बैठकीत पवार यांनी ठाकरे यांना सांगितले की, खातेवाटप लवकरात लवकर करा, असे सांगितल्याचे समजते. बैठकीला पवार, ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार, जयंत पाटील, खा. संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे तूर्तास तरी गृहखाते हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करावा याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एसीबीकडून क्लीन चिट मिळालेले अजित पवार अजूनही मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल, असे मानले जाते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अद्याप निश्चित झालेला नाही.
Visit : bahujannama.com