नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. हैदराबाद एन्काऊंटरने संपूर्ण देश ढवळून निघाला असून अनेक क्षेत्रातील जेष्ठ लोकांनी आणि राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नागरिक म्हणून पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरचे समर्थन एका बाजुला होत असताना कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायला हवी होती असं म्हणत प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जात आहे.
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटरवर चार दिवसांपूर्वी एका यूजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यात यूजर्सने जो सल्ला दिला होता अगदी त्याच प्रमाणे एन्काऊंटर झाल्याची चर्चा आहे. ‘आरोपींनी हा गुन्हा कसा केला आहे याविषयी विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण जायला सांगितलं तरीही ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला आणि त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला.’ असे पोलिस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर युजरने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या रिप्लायची चर्चा सुरु झाली. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट कऱण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
काय आहे प्रकरण ?
हैदराबादमध्ये काही दिवसांपुर्वी महिला डॉक्टरचा बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटना ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणीच या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ४ नराधमांनी २५ वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं.
घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.
महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, ‘दीदीने रात्री ९.२० च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.
Visit : bahujannama.com