मुंबई बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत निवडून आलेल्या खासदारांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकऱणी गडचिरोली-चिमूर मतदार संघातील खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदीया मतदारसंघातील खासदार सुनील मेंढे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावली आहे. तर त्यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. रमेशकुमार गडवे यांनी अशोक नेते तर कारू नान्हे यांनी सुनील मेंढे यांच्याविरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. निवडणूकीतल वापरण्यात आलेल्या दोषपुर्ण ईव्हीएममुळे झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यांच्यात तफावत आढळून आली आहे. त्याचा फायदा विजयी उमेदवाराला झाला. त्यासोबतच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन न केल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी तसेच दोन्ही मतदारसंघांमध्ये नव्याने निवडणूक घेण्यात यावे असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.
तर याप्रपकरणी याचिकाकर्त्यांकडून अड. निहालसिंग राठोड, तर निवडणूक आयोगातर्फे अड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली. त्यावेळी न्यायमुर्ती रोहित देव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानंतर त्यांनी नोटीस बजावली.