मुंबई ः बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांमुळे अर्थचक्राला धक्का बसल्याने राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार लागू केलेल्या निर्बंधांमध्ये काही शिथिलता आणणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत भाष्य केले आहे.
टोपे म्हणाले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यात दुकाने बंद आहेत हे मान्य आहे, पण जीव वाचवण्याला प्राधान्य दिले जात आहे. निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देता येईल का यावर मंत्रिमंडळात विचार करू. निर्बंध कडक केले असले तरी लॉकडाऊन केलेला नाही, असे स्पष्टीकरण टोपे यांनी दिले आहे. तसेच या कठीण काळात कुणीही राजकारण करू नये, भाजपनेही सहकार्य करावे, अशी विनंती टोपे यांनी केली आहे.
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे
1) 40 लाख लस उपलब्ध झाल्या नाही, तर 3 दिवसात लसीकरण बंद होईल.
2) कोरोनाचा स्ट्रेन बदलला आहे का अशी शंका आहे. याबाबत केंद्राला कळवले असून नमुने दिले आहेत.
3) वय 20 ते 40 या गटाला लस द्या अशी मागणी केंद्र सरकारला केली.
4) इतर राज्यातून ऑक्सिजनची मागणी केली.
5) खाजगी डॉक्टरांनी रेमडीसिव्हीरचा वापर केवळ निर्देशानुसार करावा.
6) रेमडीसिव्हीर 1100 ते 1400 रुपयांपर्यंतच्या किमतीतच विकावे.