नवी दिल्ली, वृत्तसंस्था : झारखंडमधील गुमलामध्ये दोन मुलींवर दहा तरुणांकडून सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. प्रकरण सदर पोलिस स्टेशन परिसरातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठी सक्रियता दाखवत शनिवारी सकाळी दहा आरोपींना अटक केली.
विवाहसोहळ्या दरम्यान 3 एप्रिल रोजी दोन्ही पीडित मुलींवर सामूहिक बलात्कार
सदर पोलिस स्टेशनचे प्रभारी शंकर ठाकूर म्हणाले की, शुक्रवारी दोन्हीही पीडित मुलींनी पोलिस ठाण्यात येत संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार दिली, त्यानंतर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 3 एप्रिलची आहे. हे दोन्ही पीडित विवाहसोहळ्यावरून परत येत होत्या. त्याचवेळी हे तरुण त्यांना घेऊन जवळच्या आंब्याच्या बागेत घेऊन गेले आणि बलात्काराची घटना घडवून आणली. त्यांनतर, आरोपींनी दोन्ही पीडितांना गावातून काढून टाकण्याची धमकी दिल्यानंतर घाबरलेल्या मुली पोलिस ठाण्यात गेल्या नाहीत, परंतु शुक्रवारी आरोपींनी पुन्हा धमकी दिली असता पिडीतांनी पोलिस स्टेशन गाठून गुन्हा नोंदविण्याचे धाडस केले.
दोन्ही मुलींनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छोटा खटंगा या गावमधील दिलेश्वर उरांव, सुकरा उरांव, संदीप उरांव, रतन उरांव , अनिल उरांव, खुदीरां उरांव, महादेव उरांव व अन्य दोन तरुणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पिडीतांनी सांगितले कि, आरोपींनी संध्याकाळी सात ते रात्री अकरा पर्यंत त्यांना ओलीस ठेवले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. सर्व तरुणांनी पीडित मुलींना मारहाण केली आणि घटनेची माहिती दिल्यास परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पीडितेला आपल्या संरक्षणाखाली ठेवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस प्रभारी शंकर ठाकूर म्हणाले की, पीडितेच्या विधानाच्या आधारे पोलिसांनी रात्रीच छापा टाकून संबंधित आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात असून पुढील तपासही सुरू आहे, पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठी पोलिसांकडूनही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.