बहुजननामा ऑनलाइन टीम – येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या लिलावपद्धीतीला विरोध दर्शविला आहे. सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणं हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखं(Gram Panchayat Election) झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या लिलावपद्धीतीला विरोध दर्शविला आहे.
लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय?
ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करणं हा उत्तम पर्याय आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पदांचे लिलाव झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. त्यासंबंधी हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जुलमी, अन्यायी इंग्रजांना देशातून घालवायचे आणि आमच्या देशात लोकांची, लोकांनी, लोक सहभागातून चालविलेली लोकशाही आणायची असे त्यांचे स्वप्न होते. मात्र, सरपंच पदाचा लिलाव म्हणजे त्या लोकशाहीचाच लिलाव आहे, असे आमचे मत आहे. ज्या लोकशाहीसाठी १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांत लाखो लोकांनी तुरुंगात जाऊन, भूमीगत राहून इंग्रजांच्या गोळ्या, लाठ्या-काठ्या खाऊन अनंत हाल अपेष्टा सहन केल्या. प्रश्न उभा राहतो की ज्यांनी देशात लोकशाही यावी यासाठी प्राणांचे बलिदान केले त्यांचे बलिदान व्यर्थ झाले आहे काय? किंवा ७० वर्षांत काही लोकांना लोकशाहीचा अर्थ समजला नाही की काय? पंचायत राज मजबूत व्हावे यासाठी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत यांचे स्थान सर्वोच्च आहे.
ग्रामसभा ही सार्वभौम
ग्रामसभा ही गावची संसद आहे. ग्रामपंचायत (एक्झिक्युटिव्ह बॉडी) कार्यकारी मंडळ आहे. या दोन्ही घटकांनी एकमेकांच्या विचाराने दिल्लीची संसद लोकसभा आणि राज्याची संसद विधानसभा मजबूत करावयाची आहे. आमदार आणि खासदारांना ग्रामसभा निवडून पाठविते. त्यासाठी सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीकोन असणारे चारित्र्यशील उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडून पाठवायचे आहेत. ग्रामपंचायत सरपंचपदाचा लिलाव झाला तर लोकसभा आणि विधानसभा कमजोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आमदार आणि खासदार यांना ग्रामसभेने निवडून पाठविले असल्याने आणि लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक त्या पवित्र मंदिरामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामसभा ही सार्वभौम असून स्वयंभू आहे. १८ वर्षांचे वय झाले, मतदान करण्याचा अधिकार आला की प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सदस्य होतो. एकदा सदस्य झाला की मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नसते. ग्रामसभा ग्रामपंचायतीला निवडून देते अशा ग्रामपंचायत सरपंचाचा लिलाव होणे हा लोकशाहीचा लिलाव आहे. जागृत मतदार हा लोकशाहीचा आधार आहे.
‘गावा-गावासि जागवा । भेदभाव हा समूळ मिटवा । उजळा ग्रामोन्नतीचा दिवा । तुकड्या म्हणे ।।’ असे सांगत हजारे यांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत नवे गाव घडविण्याचा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या अनेक ठिकाणी बक्षीसे देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून मतमतांतरे होत असली तरी हजारे यांनी मात्र याचे समर्थन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘ग्रामसभेमध्ये गावच्या सर्व मतदारांच्या संमतीने बिनविरोध निवडणूक करून निवडणूक करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गावात मतभेद होत नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडतात आणि पाच वर्षे खेळीमेळीच्या वातावरणात गावाचा विकास होत राहतो.’