गडचिरोली : बहुजननामा ऑनलाईन – प्रत्येक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबवून प्रलंबित समस्या निकाली काढल्या जात आहे. केंद्र व राज्यातील सरकार जातीपातीचे राजकारण न करता प्रत्येक समाजाला न्याय देत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणेच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील बंगाली नमोशुद्र समाजाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीचे सर्वेक्षण अंतर्गत चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन व बंगाली समाजबांधवांना प्रापर्टी कार्ड वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, खा. अशोक नेते, आ.डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, जि.प. सदस्या शिल्पा रॉय, दीपक हलधर, विधान रॉय, विधान व्यापारी, भाजपाचे जिल्हा सचिव तथा पं.स. सभापती आनंद भांडेकर, पं.स. उपसभापती आकुली बिश्वास, सरपंच अनिता रॉय, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता, विष्णू ढाली, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी बंगाली समाजाची अनेक वर्षांपासून प्रापर्टी कार्डची मागणी होती. सदर समाजाची मागणी आपण शासनाकडून रेटून धरत ती पूर्ण केली. बंगाली बांधवांना आता भूमीचे स्वामित्व मिळाले आहे. ही समाजासाठी गौरवाची बाब आहे. तसेच इतर अडचणी समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खा. नेते यांनी केले. कार्यक्रमात बंगाली बांधवांना प्रॉपर्टी कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी २० ते २५ गावातील बंगाली समाजबांधव बहुसंख्येनी उपस्थित होते.