नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – उमरेड लगतच्या बेलगाव खसरा क्रमांक १२३ च्या तलावामधील अवैध खोदकाम करून त्यामधील मुरूम विकून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी यात सहभागी अधिकारी, कंत्राटदार, लोकसेवकांविरुद्ध तातडीने फौजदारी कारवाई करावी, या मागणीकरिता भारिप बहुजन महासंघाचे उमरेड विधानसभा प्रभारी राजू ऊर्फ राजेंद्र मेश्राम यांनी जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
त्यांनी प्रशासनाला सादर निवेदनात म्हटले, वेलसाखरा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहारात अनेकांचा सहभाग आहे. तसेच नगरपरिषदेच्या नालेसफाईत झालेला गैरव्यवहार, भूमिअभिलेख कार्यालय व तहसील कार्यालयात जय माँ वैष्णवी रियल इस्टेट नावाने तयार गैरकायदेशीर व अवैध निर्माणाधिन फ्लॅटची इमारत तातडीने पाडण्यात यावी, पाच एकर आणि त्यापेक्षा कमी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रतिमहिना विनाउजर वेतन देण्यात यावे, नागपूर-उमरेड- भिवापूर या राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांचे अपघात होऊन मृत्यू व गंभीर जखमी होत आहे. दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे व महामार्गाचे प्रत्यक्षात काम कधी सुरू होणार, त्याचे उत्तर लेखी स्वरूपात द्यावे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशा विविध मागण्यांकरिता मेश्राम यांनी उपोषण प्रारंभ केले आहे. यापूर्वी ३० ऑक्टोबरला बेमुदत उपोषण त्यांनी केले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून तत्काळ कारवाईचे आदेश लेखी स्वरूपात उमरेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेे. मात्र, त्या आदेशावर काहीही निर्णय झाला नाही. जवळपास दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे.