मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- काँग्रेस आणि राष्ट्रवादीने २०१४ साली मुस्लिम बांधवांसाठी ५ टक्के आरक्षणाची तरतूद केली होती, मात्र युतीचे सरकार येताच या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही. मात्र मुस्लिम आरक्षणाचा हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून आता स्थापन होणाऱ्या महाशिवआघाडी सरकारकडून हे आरक्षण लागू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यासाठी शिवसेनेला तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
बहुमत मिळूनही राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ न शकल्याने भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहे. या सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळणार असल्याने आघाडीच्या सर्व अटी शिवसेनेला मान्य कराव्या लागणार आहे.
सत्ता स्थापनेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी तिन्ही पक्षांनी मिळून एक मसुदा तयार केला आहे. त्यातील एक म्हणजे मुस्लिम समाजाला शिक्षणात ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, काँग्रेसच्या मागणीवर शिवसेनेने होकार दिल्याचे म्हंटले जात आहे. हा मसुदा त्या पक्षांच्या हायकमांडकडे पाठवण्यात येणार आहे.
Visit : bahujannama.com