बहुजननामा ऑनलाइन टीम – टाळेबंदी काळात आलेल्या वीजबिलांसंदर्भात सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा मिळाला नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टाळेबंदीदरम्यान आलेली वाढीव वीजबिले कमी करण्यासाठी दिवाळीपूर्वी सवलत देण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, त्यांचे हे आश्वासन फोल ठरण्याची शक्यता आहे. कारण दिवाळीपूर्वी कॅबिनेटची बैठक होत नसल्याने सवलतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळण्याची आशा मावळली आहे.
टाळेबंदी काळात सामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आली होती. टाळेबंदीमुळे प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने राज्यातील विविध राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी वाढीव वीजबिलांत सवलत देण्याची मागणी केली जात होती. तद्वत, ही बिले रद्द करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे स्वतः ऊर्जामंत्री नितीन राऊत जुलै महिन्यापासून सांगत होते. पण त्यासाठी राज्य सरकारच्या अनुदानाची गरज होती.
मात्र, कोरोनाने राज्य सरकारची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे तीन महिने वाटून पाहूनदेखील सामान्य नागरिकांच्या पदरात वीजबिल सवलीबाबत निराशाच पदरात पडली आहे. दोन नोव्हेंबर रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीपूर्वी वीज सवलतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे संकेत दिले होते. पण मागील कॅबिनेटच्या बैठकीत त्यासंदर्भात प्रस्ताव येईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. तद्वत, या आठवड्यातही कॅबिनेटची बैठक होत नसल्याने सवलतीच्या प्रस्तावावर चर्चा आणि त्याबद्दलची घोषणा अशक्य असल्याचे ऊर्जा विभागातील सूत्रांनी म्हटलं.