कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – सरकारने आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना करून त्या आकडेवारीनुसार आरक्षण द्यावे. ज्यांची संख्या अधिक, त्यांना आरक्षण अशी भूमिका ठेवावी. सध्या दिलेले आरक्षण कुठल्या आधारे दिले आहे, याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जनतेला द्यावी, अशी मागणीही माजी आ. प्रकाशआण्णा शेंडगे यांनी केली. तसेच याबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास सरकार उलथवून टाकू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लावणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते; मात्र मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्राप्त होताच ओबीसी आरक्षणाला धक्का लावून महापाप केले असून, सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप माजी आ. प्रकाशअण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शेंडगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देत असताना मराठा समाजाला नोकरीत, शिक्षणासाठी आरक्षण दिले जाईल, असे जाहीर केले होते; मात्र मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर कुठल्याही चर्चेविना १६ टक्के आरक्षण जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाने ५२ टक्क्यांवर आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. संविधानाने आरक्षणासाठी दिलेले संरक्षण व मुद्द्याचे पालन केलेले नाही.
२५ फेब्रुवारीस समितीच्या वतीने मुंबई विधानभवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याला आमचा कोणताही विरोध नाही. उलट समाजातील प्रत्येक घटकाने या समाजाला आरक्षण मिळण्याची भूमिका घेतली होती. राज्य सरकारनेही अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यामुळे राज्य सरकार घटनेच्या चौकटीत बसवून मराठा समाजाला आरक्षण देईल, असे वाटत होते. या समाजाला एसईबीसी अंतर्गत १६ टक्के आरक्षण दिले. न्यायालयीन पातळीवर हे आरक्षण टिकणार नाही. ओबीसी कोट्यातूनच या समाजाला आरक्षण दिले, तरच टिकणार आहे, नाही तर २७ टक्के आरक्षणाला धक्का बसणार आहे. ओबीसी, मराठा यांच्यात होणारा संघर्ष टाळण्यासाठी सरकारने आपली भूमिका जाहीर करावी.
घटनाबाह्य आरक्षणाविरोधात कोल्हापुरातून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली असून, राज्याच्या सर्व भागातून रथयात्रा काढून जनजागृती करून २५ फेब्रुवारीस ओबीसी समाजातील लोकांच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले असून, सुमारे ५ लाख नागरिक आझाद मैदानावर येणार आहेत. पत्रकार परिषदेस हरिभाऊ राठोड, आ. डॉ. नारायण मुंडे, श्रावण देवरे, बालाजी शिंदे, प्रा. नागराव पांचाळ, अर्चना सुतार, दिगंबर लोहार, जी. डी. तांबे, शिवाजीराव माळकर, अरुण खरमाटे, सचिन माळी आदी मान्यवरांसह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.