मुंबई बहुजननामा : राज्य सरकारने जाहीर केलेल्या मेगा भरतीतील पदांसाठी अर्जांचा पूर आला आहे. ३१ हजार ८८८ पदांच्या या मेगा भरतीसाठी सुमारे ३२ लाख अर्ज आले आहेत. म्हणजेच प्रत्येक पदासाठी चक्क १०० उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यापैकी प्रत्येक तिसर्या उमेदवाराने ग्रामविकास विभाग पदासाठी अर्ज केले आहेत.
या विभागासाठी १३ हजार ५१४ पदे रिक्त आहेत. यासाठी ११. २ लाख एवढे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र पशुधन विभागात ७२९ पदे रिक्त आहेत. प्रत्येक पदासाठी ४५२ इच्छुक उमेदवार आहेत. त्याची एकूण संख्या ३. ३ लाख आहे. वनरक्षक पदासाठी ४४८ पदे भरली जाणार आहेत. इतर रिक्त पदांसह एकूण ९०० जागांसाठी जाहिरात काढली गेली आहे. या पदांसाठी ४ लाख एवढे अर्ज आले आहेत. इतर विभागांच्या अर्जांची संख्या लाखांच्या पुढे आहे. महसूल विभागाच्या १ हजार ८०२ पदांसाठी ५.६ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ५ हजार ७८८ पदांसाठी ४.२ लाख, तर सार्वजनिक वित्त विभागाच्या ९३२ पदांसाठी १.७४ लाख उमेदवारांनी अर्ज केले असून यामध्ये कनिष्ठ लेखापाल, लिपिक इत्यादी जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यात ७२ हजार पदांसाठी मेगा भरतीची घोषणा केली होती. मराठा आरक्षण आंदोलनामुळे त्याची प्रक्रिया रखडली होती.