मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्याने स्वत:च्याच द्राक्षबागेत विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबासाहेब ठुबे (रा.खेडगांव ता. दिंडोरी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर या प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वीजबिलाची थकबाकी भरण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. परंतु, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीतील वीज तोडली. तर शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या त्या शेतकऱ्यांने आपला प्राण गमावला आहे.
या घटनेवरून राजू शेट्टी म्हणाले, राज्यकर्त्यांनो कोरोनाच्या नावाखाली हजारो कोटीचा घोटाळा केला आहात. मंत्र्यांच्या दालनावरती कोट्यावधी रूपयाचा चुराडा केलात. संगनमताने जनतेच्या खिशातून शंभरकोटी लुटीसाठी सर्वजण सैराट झालात. बाळासाहेब बाबुराव ठुबे या माझ्या बळीराजाने मात्र द्राक्ष पीक डोळ्यांसमोर करपू लागल म्हणून हजार रूपयाच्या थकबाकीसाठी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्यामुळे उर्जामंत्री व संबंधित महावितरणचे अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, असे ट्विट करत राजू शेट्टींनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, लॉकडाऊनच्या बातम्यामुळे द्राक्षांचा भावही बाजारात घटला असल्याने, बाबासाहेब हे चिंतेत होते. बाबासाहेब ठुबे यांच्या पत्नी कोथींबीर विकण्यासाठी गावात गेल्या असता, बाबासाहेब घरातून विषारी द्रव्य घेऊन ते द्राक्षबागेत गेले, व तेथेच त्यांनी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच त्यांच्या पत्नी त्यांना शोधत द्राक्षबागेत आल्यानंतर पुढे दृश्य बघून त्यांना मोठा धक्का बसला. नंतर तेथील लोंकाच्या मदतीने बाबासाहेब यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. परंतु, मध्यरात्री दोनच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आपल्या शेतातील वीज तोडल्यामुळे ते त्रस्त होते, शेतीची कामं आणि बागेची काढणी यंत्रांशिवाय कशी करायचा हे प्रश्न त्यांना भेडसावत होता. त्यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल घेतलं.