मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ आढळून आली होती. या गाडीचे मालक व्यवसायिक मनसुख हिरेन यांचा 5 मार्च रोजी संशयास्पद मृतदेह आढळून आला. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथक (ATS) करत असून या प्रकरणाचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकृत माहिती लवकरच दिली जाऊ शकते. एटीएसचे प्रमुख जयजीत सिंह यांनी आज (सोमवार) गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट देखील घेतली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असताना मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात झालेले एक फोन संभाषण समोर आले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्कॉर्पिओ सापडल्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मनसुख हिरेन आणि त्यांचे भाऊ विनोद यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग एटीएस आणि एनआयएकडे आहे. दोन भावांच्या संभाषणातून अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा समोर आला आहे. असे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.
मनसुख हिरेन आणि विनोद यांच्यात झालेले संभाषण
विनोद – झोप झाली का ? काय झालं ?
मनसुख – माझा जबाब नोंदवून घेतला आहे. आता पुन्हा जावे लागणार नाही.
विनोद – जबाबामध्ये काय लिहून घेतलं ? ती गाडी सचिन वाझेही चालवायचे हे जबाबात सांगितले का ?
मनसुख – नाही, मी जबाबात तसा उल्लेख केला नाही.
विनोद – का नाही सांगितले ?
मनसुख – ती गाडी मी चालवतो हे कोणालाही सांगू नको, असे सचिन वाझे यांनी सांगितले होते. त्यामुळे मी जबाबात तशी माहिती दिली नाही.
विनोद – तू ही गोष्ट चुकीची केली आहेस. यामुळे कोणती गडबड तर होणार नाही ना ?
मनसुख – काही होणार नाही, हे प्रकरण साहेबांकडेच (सचिन वाझे) आहे.
विनोद – एटीएसचं पथक देखील चौकशी करताना तुला विचारतील.
मनसुख – साहेबांकडेच सर्व पेपेर आहेत. साहेबच प्रमुख आहेत. आता पुढे काही होणार नाही.