नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावे, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी संघटनांशी केलेल्या अनेक चर्चा निष्फळ ठरल्यानंतर केंद्र सरकार आता काहीशी नरमाईची भूमिका घेताना दिसत आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र हे सांगत असताना या मंत्र्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. आंदोलन करणारे शेतकरी हे खरे शेतकरी असल्याचे आपल्याला वाटत नाही, असे चौधरी यांनी म्हटले आहे. एकीकडे शेतकरी आंदोलनावर कोणताही तोडगा निघत नसताना चौधरी यांनी असे विधान करून आंदोलनकर्त्या शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
Govt has said that MSP will continue. We can give it in writing too. I think Congress govt (in states) & Opposition are trying to instigate farmers. Nation's farmers are in favour of these laws but some political people are trying to add fuel to the fire: MoS Agriculture pic.twitter.com/d2nv5keFtv
— ANI (@ANI) December 6, 2020
चौधरी म्हणाले की, मला वाटते की राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत. काही राजकीय लोक आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि शेतकऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. देशात अशांतता पसरेल असा कोणताही निर्णय शेतकरी घेणार नाहीत, यावर माझा ठाम विश्वास आहे. या कायद्यांमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे. जे खरे शेतकरी आहेत, ते आपल्या शेतात काम करत आहेत आणि मला वाटत नाही की ते दुःखी आहेत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांशी झालेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत देखील शेतकऱ्यांचे काही वाद झाले. आम्ही आमच्या मागणीवरून मागे हटणार नसल्याचे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. परिस्थिती इतकी बदलली की, शेतकरी नेत्यांनी सुमारे तासाभर मौनव्रत देखील धारण केले. बैठकीदरम्यान मंत्री देखील बैठक सोडून निघून गेले. त्यानंतर आता पुढील बैठक ही 9 डिसेंबरला होईल हेच सांगण्यासाठी मंत्री बैठकीत परतले. दरम्यान 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचे समर्थन मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.