नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन उग्र रूप धारण करू लागले. सरकार ताठर भूमिका सॊडत नसल्याने हे आंदोलन चिघळत चालले आहे. काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर आता आणखी एका शेतकऱ्यानं सुसाईड नोट मागे सोडत आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. टिकरी सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मवीर सिंह या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. ५० वर्षाचे सिंह हे जिंदच्या सिंहवाला गावचे रहिवासी होते.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कर्मवीर दरियाव सिंह हे गेल्या काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. टिकरी सीमेवर शहराच्या बायपास रोड स्थित एका नव्या बसस्टँडजवळ एका झाडाला दोरखंडाच्या सहाय्यानं गळफास घेत कर्मवीर यांनी आत्महत्या केली.रविवारी सकाळी हा प्रकार काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला.
शेतकऱ्यांनी या घटनेची सूचना पोलिसांना देताच पोलीस लगेचच घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. तसंच या घटनेची माहिती मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही दिली आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ एक सुसाईड नोटही आढळली आहे. त्यामध्ये भारतीय किसान युनियन जिंदाबाद असं म्हटलं गेलंय. मोदी सरकार तारखांवर तारीख देत आहे. हे काळे कायदे कधी रद्द होतील, याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. जो पर्यत हे काळे ककयदे रद्द होत नाही तो पर्यत आम्ही इथून जाणार नाही, असंही या पत्रात म्हटलं आहे.