मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्ता वसुलीचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उध्द्व ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात केला आहे. त्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची CBI मार्फत चौकशी व्हावी यासाठी परमबीर सिंह यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने आधी हायकोर्टात याचिका दाखल करावी अशी सुनावणी केली. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी गुरुवारी (दि. 25) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात गृहमंत्री देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. गृहमंत्री देशमुख यांचा भ्रष्ट कारभार पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजरेत आला होता. देशमुख हे अनेक पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे आणि पैसे गोळा करण्याच्या सूचना द्यायचे.
तसेच ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलिस अधिकाऱ्यांना माहिती होते, असे सिंग यांनी पत्रात नमूद केेले आहे.