गुवाहाटी : वृत्तसंस्था – भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई हे आसाम राज्यात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात, असा दावा आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते तरुण गोगोई यांनी केला आहे. आसाम राज्यात पुढील वर्षी विधानपरिषदेची निवडणूक होत आहे.
हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तरुण गोगोई यांनी शनिवारी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. ते म्हणाले की, माल माझ्या काही सूत्रांनी ही माहिती दिली आहे की रंजन गोगोई यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. कदाचित त्यांना आसामचे पुढील मुख्यमंत्री म्हणूनही पुढे केलं जाऊ शकतं. जर माजी सरन्यायाधीश राज्यसभेवर जाऊ शकतात तर ते भाजपकडून मुख्यमंत्री पदाची निवडणूकही लढवू शकतात, असं तरुण गोगोई यांनी यावेळी म्हटलं.
हे सर्व राजकारण आहे. अयोध्येतील राम मंदिराबाबतच्या निर्णयामुळे भाजप रंजन गोगोई यांच्यावर खूश आहे. रंजन गोगोई यांनीही राज्यसभेच्या सदस्यत्व स्वीकारून त्यांनी हळूच राजकारणात प्रवेश केला आहे, असे सांगत त्यांनी राज्यसभेत जाण्यासाठी नकार का दिला नाही असा सवाल तरुण गोगोई यांनी उपस्थित केला आहे. ते अगदी सहजपणे मानवाधिकार आयोग किंवा इतर मोठ्या संस्थेचे चेअरमन बनू शकले असते. मात्र, त्यांना राजकीय महत्वकांक्षा आहे आणि याच कारणामुळे त्यांनी राज्यसभेच्या खुर्चीचा स्विकार केला असल्याचे तरुण गोगोई यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तरुण गोगोई यांनी स्वत: आसामच्या मुख्यमंत्री पदाचा दावेदार नसल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, मी राज्याचा मुख्यमंत्री बनणार नाही. मी एक सल्लागाराप्रमाणे काम करणं जास्त पसंत करेन. काँग्रेसमध्ये अनेक उमेदवार आहेत, जे ही जबाबदारी घेऊ शकतात, असंही तरुण गोगोई यांनी यावेळी म्हटले.