लातूर : बहुजननामा ऑनलाईन – उदगीर तालुक्यातील हेर व परिसरातील गावांत मागासवर्गीय वस्ती सुधार योजने अंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करून मागासवर्गीय वस्तीत विद्युतीकरणाची योजना राबवून मोठमोठे एलईडी दिवे बसविण्यात आले. मागासवर्गीय वस्त्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाल्या, परंतु गेल्या काही महिन्यांपासून गावातील वस्तीतील एलईडी दिवे बंद पडल्याने जनतेची गैरसोय होऊ लागली आहे. एलईडी दिव्यांच्या दुरुस्तीचे ग्रामपंचायतीसह प्रशासनाला सोयरसूतक नसल्याने मागासवर्गीय वस्त्यांत पुन्हा अंधार निर्माण झाला आहे. त्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेर ग्रामपंचायतीने मागासवर्गीय वस्तीमध्ये विद्युतीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात करून मोठमोठे एलईडी दिवे बसवून मागासवर्गीय वस्त्यांसह गाव लख्ख प्रकाशाने उजळून निघाले, परंतु मागासवर्गीय वस्त्यांत विद्युतीकरणाचे काम करीत असताना गुणवत्तेला बाजूला सारून गुत्तेदारी निभावण्याचे काम झाल्याने काही महिन्यांतच गावातील बसविण्यात आलेली दिवे एक एक करीत बंद पडली व जनतेला पुन्हा अंधारात चाचपडण्याची वेळ आली.
एलईडी दिवा बंद किंवा नादुरुस्त झाल्यानंतर त्या ठिकाणी दुरुस्ती व नवीन दिवा लावण्याची जबाबदारी एलईडी दिवे पुरवठा करणाऱ्या कंपनीची आहे, परंतु मागासवर्गीय वस्त्या व गावातील बंद पडलेली दिवे ग्रामपंचायत व प्रशासनाकडून चालू केले जात नसल्याने जनतेतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एलईडी दिवे बंद पडत असल्याने लाखो रुपयांचा चुराडा करूनही मागासवर्गीय वस्तीतील विद्युतीकरणाची योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.