लातूर : बहुजननामा ऑनलाइन – जात, धर्म, लिंग, प्रदेश, भाषा अशा मुद्यांवर निवडणूक लढली जाते. त्यातून द्वेष पसरविले जातात. हे लोकशाहीला घातक आहे, असे प्रतिपादन डॉ. जयदेव डोळे यांनी केले. ॲड.भगवानराव चाटे स्मृती व्याख्यानमालेत ‘राजकीय वर्तमान आणि भविष्य’या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ॲड. भगवान पौळ तर माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, डी. बी. लोहारे, जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. डोळे म्हणाले की, राजकारणात धर्माचा आधार घेतला की चिकित्सा आडवी येत नाही. तर्कशुद्ध विचार गहाण पडतो. यावेळी रवि बापटले यांना ॲड. भगवानराव चाटे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचलन प्रा. दीपक चाटे यांनी केले तर आभार ॲड. सुहास चाटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी व्यंकट करले, एन. डी. राठोड, मेघराज गायकवाड, गणेश मदने, अमोल वाघमारे ॲड. एजाज बक्षी, चंद्रशेखर पवार यांनी पुढाकार घेतला.