मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. यात राज्यातील गरीब अन् गरजू लोकांना 15 एप्रिलपासून पुढे एक महिन्यासाठी शिवभोजन थाळीअंतर्गत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध केली होती. त्याला आता आणखी 1 महिन्याची मुदतवाढ दिली असून 14 जूनपर्यंत या योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा सुरु राहणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊन काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. राज्यात गेल्या 15 एप्रिल 2021 पासून शिवभोजन योजनेअंतर्गत नि:शुल्क थाळी उपलब्ध करून दिली जात आहे. दरम्यान 15 एप्रिल ते 20 मे 2021 या कालावधीत 48 लाख 44 हजार 709 नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. तसेच योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे.संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण 950 केंद्र सुरु आहेत. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.