कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – समाजिक गटातील असमानता, अस्पृश्यतेशी निगडित असलेली वगणूक, जातीवर आधारित सामाजिक भेदभाव यामुळे दलित समाजात विषमता निर्माण झाली आहे. समाजात असलेली विषमता दूर करण्यासाठी सरकारने नोकरी, व्यवसाय, उद्योग, नागरी क्षेत्राच्या विकासात तरतुदी करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केले. छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या संयुक्त विचारातून हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे पार पडलेल्या ऐतिहासिक दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषदेने शताब्दी वर्ष पूर्ण केले आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उद्घाटन शाहू स्मारक भवन येथे सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांच्या व्याख्यानाने करण्यात आले. ‘दलित, वंचित समाजाची स्थिती आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते.
अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, जागतिकीकरणाच्या रेट्याखाली सुरू असलेल्या प्रक्रियेमुळे आर्थिक शिथिलीकरणाच्या नावाने विविध क्षेत्रात माघार घेण्याचे धोरण सरकार अवलंबत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्र आरक्षणाच्या धोरणाविरोधात अद्यापही राहिले आहे. या क्षेत्रातील आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने अनेक वेळा आवाहन केले; मात्र या ठिकाणी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांनी समाजातील उपेक्षित गटांना भेदभावाची वागणूक दिली आहे. सरकारने दलित समाजाला संरक्षण देण्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा केला. याबाबत अनेकांनी टीका केली; परंतु जे मुद्दे मांडण्यात आले होते, त्यांचाही आपण विचार केला असून त्याचा सविस्तर समाचार आपल्या पुस्तकातून घेतला आहे. यावेळी आनंद राणे, रमेश रत्नाकर, प्रा. विनय कांबळे, प्रा. ए. बी. कांबळे, उत्तम चोपडे आदी उपस्थित होते. प्रास्तविक राहुल ठाणेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सिद्धार्थ पद्माकर यांनी केले, तर आभार प्रा. ए. बी. कांबळे यांनी मानले.