कणकवली : बहुजननामा ऑनलाइन – मालवण तालुक्यातील असरोंडी गावातील धनगर वस्तीत जाणारा रस्ता काही ग्रामस्थांनी अडविल्यामुळे धनगर समाजातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विरोधात या समाजाला न्याय मिळावा, या मागणीसाठी आरक्षित समाज कणकवली तालुकाध्यक्ष सुजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या वतीने असरोंडी सरपंच स्नेहल सावंत यांना निवेदन सादर करण्यात आले.
गाव तिथे विकास ही योजना केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभर राबविली जात आहे. एकीकडे शासन प्रत्येक घराघरात वाड्यावाड्यात रस्ता जावा अनेक योजनांचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र मालवण तालुक्यातील असरोंडी गावात तब्बल तीन पिढ्यांपासून रहिवासी असलेल्या धनगर समाजातील नागरिकांना मात्र रस्त्यासाठी शासन दरबारी वणवण करावी लागत आहे. धनगर वस्तीत जाणारा रस्ता अडविल्यामुळे येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रस्ता नसल्यामुळे शाळकरी मुलांना पायी पायपीट करावी लागत आहे. आजारी व्यक्तींना उचलून न्यावे लागते. गरोदर स्त्रीयांना सुद्धा रुग्णालयात दाखल करताना तारेवरची कसरत करत रुग्णांना जीव मुठीत घेऊन रुग्णालयात दाखल करावे लागते. तसेच अनेक समस्या रस्ता नसल्यामुळे या नागरिकांना सहन कराव्या लागत आहेत. ही बाब आरक्षित समाज कणकवली तालुकाध्यक्ष तथा चर्मकार समाज तालुकाध्यक्ष सुजित जाधव यांच्या लक्षात येताच जाधव यांनी धनगर समाजाच्या व्यक्तींच्या व्यथा जाणून घेत शासन दरबारी न्याय मिळण्यासाठी असरोंडी सरपंच स्नेहल सावंत यांची भेट घेतली. महाराष्ट्र अधिनियम मामलदार कोर्ट ॲक्ट १९६६ नुसार रस्ता अडविणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार प्रशासनाच्या हाती असल्याची बाब जाधव यांनी सरपंच सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावर संबंधित वाडीत जाणारा रस्ता मंजूर झाला आहे.. मात्र जमीन मालकांनी तक्रार दाखल केल्यामुळे हे काम थांबले असल्याचे ग्रामसेवक झोरे यांनी सांगितले. या वस्तीत सुमारे १७५ रहिवासी असून वस्तीत आग लागण्यासारखी एखादी वाईट घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल करत धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, असे जाधव यांनी सांगितले.
उपसरपंच मकरंद राणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष महाजन, ग्रामसेवक प्रसाद झोरे तर सुजित जाधव यांच्या समवेत आरक्षित समाज कणकवली तालुका उपाध्यक्ष तथा सुतार समाज तालुकाध्यक्ष महेश सुतार, शिवसेना असरोंडी शाखाप्रमुख बाळा बागवे, सुनील सावंत, योगेश परब, संजय सावंत, मोहन परब, बबलू परब, बाळकृष्ण कोकरे, अंकुश शिंगाडे, गंगाराम शिंगाडे, लक्ष्मण शिंगाडे, गणेश शिंगाडे, सुनील शिंगाडे, राजू कोकरे, अंकुश जंगले, प्रकाश जंगले, विकास जंगले, विलास जंगले, बबन जंगले, सुमती कोकरे, साखराबाई कोकरे, सीताबाई खरात, लक्ष्मी शिंगाडे, गीता शिंगाडे, सुनीता शिंगाडे, लक्ष्मी जंगले, सीताबाई जंगले, जनाबाई जंगले आदी उपस्थित होते.