बहुजननामा ऑनलाइन टीम : राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते म्हणून धनंजय मुंडे यांची ओळख आहे. परळीतल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लढाईत त्यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभा गाठली. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश हा निश्चित मानला जात होता. अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या भगवानगडावर येण्यासाठीही धनंजय मुंडेंना निमंत्रण मिळाले. स्वतः धनंजय मुंडे यांनीच सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली होती. पण पक्ष धनंजय मुंडे यांना वेगळीच जबाबदारी देण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री झाल्यानंतर भगवानगडावर येण्यासाठी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी निमंत्रण दिले आहे. पण धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद हुकण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या नावाला प्रदेशाध्यक्षपदासाठी पसंती दिली जाऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून दुसरा प्रदेशाध्यक्ष नियुक्त केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभा गाजवणारे धनंजय मुंडे यांच्या नावाला पक्षातील अनेकांची पसंती मिळाली आहे. धनंजय मुंडेंच्या नेतृत्वगुणांचा पक्षाच्या संघटनासाठी फायदा होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॉंग्रेसकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे कॉंग्रेस आता राज्याची धुरा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा स्वतः कॉंग्रेस हायकमांडचीच असल्याचे सांगितले जात आहे.
Visit : bahujannama.com