मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इयत्ता चौथीतील एका मुलाने लिहिलेला निबंध वाचून त्या शाळेतील शिक्षकांनाही गहिवरून आले होते. त्या मुलाने ज्या वहीच्या कागदावर हा निबंध लिहिला होता, तो कागद सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हजारो वाचकांचे डोळेही भरून आले. सामाजिक न्याय मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनाही या निबंधातील वेदना जाणवल्या. त्यांनी तातडीने दखल घेत या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. बीडमध्ये घडलेल्या प्रकाराची सत्यताही त्यांनी पडताळली. या छोट्या मुलाचे नाव आहे, मंगेश परमेश्वर वाळके.
चौथीच्या वर्गातील मुलांना शिक्षकांनी माझे वडील या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले होते. मंगेशकडे वडीलांच्या केवळ आठवणीच होत्या, कारण त्याच्या वडीलांचे महिनाभरापूर्वीच निधन झालेय. त्याने आपल्या मनातील वेदना निबंधात मांडताना लिहिले… माझे नाव मंगेश परमेश्वर वाळके. माझ्या पप्पांचे नाव परमेश्वर वाळके असे होते. माझ्या पप्पाला टीबी हा आजार झाला होता. म्हणून माझ्या मम्मीनं मला मामाच्या गावाला पाठवलं होतं. माझे पप्पा वारले. माझे पप्पा गवंडीच्या हाताखाली काम करायचे. मला खाऊ आणायचे. वही, पेन आणायचे. माझा लाड करत होते. मला माझे पप्पा लई आवडत होते. माझे पप्पा वारले. माझी मम्मी खूप रडली. मी बी लई रडलो…..अशी सुरूवात करून मंगेशने हा निबंध लिहिला होता. हा निबंध पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी मंगेशला मदतीचा हात दिला आहे.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वाळकेवाडी या छोट्या गावात मंगेश राहतो. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागाकडून दीड लाख रूपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. शिवाय, दिव्यांग कल्याण निधीतून इतरही मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. मंगेशच्या वडिलांचे क्षयरोगाने (टीबी) निधन झाले असून त्याची आई दिव्यांग आहे. परिस्थिती हलाखीची असतानाही मंगेशला शिक्षणाची आवड आहे. या दुखातून हे कुटुंब अद्याप सावरलेले नाही. आता पालकमंत्र्यांनी केलेल्या मदतीमुळे या कुटुंबाला बर्यापैकी आधार मिळणार आहे.
Visit : bahujannama.com