बहुजननामा ऑनलाईन – लसींच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रापेक्षा दुप्पट लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशला दीड कोटी लसी आत्तापर्यंत मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्राला दोन कोटीपेक्षा अधिक लसी मिळाल्या आहेत. मग या लसी कुठून आल्या? जमिनीतून उगवल्या का? केंद्र सरकारनेच दिल्या ना. तरीही सरकार कांगावा करत आहे. काही नेत्यांची स्क्रिप्ट ठरलेली असते. केंद्राने दिल नाही, केंद्राने करायला पाहिजे. याच गोष्टी हे नेते रोज सकाळी उठून बोलत असतात, असे म्हणत फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसापूर्वीच 2 कोटी 90 हजार नागरिकांचे लसीकरण केल्याचे जाहीर केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाडमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी विविध विषयावर भाष्य केले आहे. राज्य कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचे सांगत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. राज्य सरकार हे फक्त मुंबईचं सरकार आहे. ह्या सरकारला मुंबईच्या बाहेरचा महाराष्ट्र दिसत नाही. नागपूरमध्ये तर सरकारच एकही कोविड सेंटर नाही, जे आहेत ते महापालिकेचेच आहेत. कोरोना संकटात सरकारने मुंबईच्या बाहेर पाहिलेच नाही. राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन मिळाल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्राला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे.
यावरुन दिल्लीच्या कोर्टात सुनावणीही सुरु आहे की, महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजन का? तरीही सरकार केंद्राच्या नावाने कांगावा करत आहे. सरकारला वाटत आहे की त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. पण हा गोंधळ तात्पुरत्या स्वरुपाचा आहे. तो ओसरल्यावर नागरिकांना सगळ काही खरं कळत असते. दरम्यान फडणवीस यांनी यावेळी तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी भागातल्या नुकसानीची पाहणीही केली.