नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 17) रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.
या भेटीदरम्यान फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या सचिन वाझे प्रकरणाची माहिती पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढ काय पावलं उचलावी, या राजकीय स्थितीचा फायदा घेता येईल का? अशी चर्चा या भेटीत झाल्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मुंबई पोलीस आयुक्तांची बदली, सचिन वाझे प्रकरणावर सरकारवर सडकून टीका केली. मुंबई पोलीस आयुक्तांची तर बदली केली. पण वाझे यांना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
2018 मध्ये मी मुख्यमंत्री असताना वाझेंना सेवेत पुन्हा घेण्यास शिवसेनेचा दबाव होता. परंतु हायकोर्टाच्या आदेशामुळे निलंबित असलेल्या वाझेंना पुन्हा घेण्यास मी नकार दिल्याचा दावाही फडणवीस यांनी केला आहे. मनसुख हिरेण प्रकरणाचा तपासही एनआयएने आपल्याकडे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. हे पोलीस दलाचे अपयश नाही, तर सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.