मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये वाढपी पदासाठी परीक्षा घेण्यात आली. वाढपी पदाच्या १३ रिक्त जागांसाठी राज्यातून तब्बल ७ हजार अर्ज आले. त्यात अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतांश हे पदवीधर उमेदवार होते. त्यामुळे आता वाढपी म्हणून पदवीधर मंत्रालयात दिसतील अशी स्थिती आहे.
राज्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे. राज्यात नोकरी नसल्याने नोकरीच्या शोधात पदवीधर तरुणही चतुर्थ श्रेणीच्या पदाकरता अर्ज करत आहेत. यापुर्वी अभियांत्रिकी पदवीधरांनीदेखील चतुर्थ श्रेणी पदासाठी अर्ज केल्याचे पाहावयास मिळाले होते.
मंत्रालयात विधानभवन, कोकण भवन, मंत्रालयासमोरील प्रशासकिय भवन येथे एकूण सात कॅन्टीन आहेत. त्यात सध्या एकूण २७५ कर्मचारी कार्यरपत आहेत. या कॅन्टीनमध्ये १३ वाढपी पदं रिक्त होती. त्यासाठी गेल्या वर्षी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर या जागांसाठी तब्बल ७ हजार अर्ज करण्यात आले आहेत. त्यापैकी ३ हजार ६०० उमेदवारांनी परीक्षा दिली. यातील बहुतांश उमेदवार हे पदवीधर आहेत. तर या परीक्षेची गुणवत्ता ९६ ते ९० एवढी असणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार या उमेदवारांना २५ ते ३० हजारांच्या दरम्यान पगार असणार आहे.