मुंबई बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्याविरोधात वंचितचेच नेते अब्दुल रहमान अंजारिया यांनी ३५ कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. लक्ष्मण माने यांनी केलेले आरोप तथ्यहीन आणि खोटे असल्याचा दावा अंजारिया यांनी केला आहे. मानेंनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणी अंजारिया यांनी केली आहे.
लक्ष्मण माने यांनी काही दिवसांपुर्वीच वंचित बहुजन आघाडीबाबत आणि नेत्यांबाबत गंभीर आरोप केले होते. त्यावेळी अंजारिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपमध्ये काम केले आहे. असे आरोप केले होते. अंजारिया यांनी वंचितच्या तिकीटावर निवडणूक लढविल्याबाबतही त्यांनी आक्षेप घेतले होते.
त्यानंतर अंजारिया यांनी मानेंनी केलेले आरोप खोटे असल्याचा तसेच ते तथ्यहीन असल्याचा दावा केला आहे. याबाबत वकिलांमार्फत ३५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन आपल्यावरील आरोपांबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
काय म्हणाले होते लक्ष्मण माने ?
आमच्यामुळे भाजपला लोकसभेत १० जागा मिळाल्या. प्रकाश आंबेडकरांच्या भुमीकेमुळे प्रतिगामी शक्तींना फायदा होतो आहे. विधानसभेतही प्रकाश आंबेडकरांनी ही भुमीका घेतली आहे. हा पक्ष वंचितांचा राहिलेला नसून त्यात आरएसएसचे लोक घुसले आहेत. गोपीचंद पडळकर, अजारीया हे आरएसएसचे एजंट आहेत असे गंभीर आरोप लक्ष्मण माने यांनी केले होते.
हा पक्ष उभा करण्यासाठी आम्हीदेखील परिश्रम घेतले आहेत. आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आमची वेगळी वाटचाल करू पक्ष नव्याने उभा करू प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याकडून अजूनही भारिपचं काम सुरु आहे. आम्ही आमच्या पद्धतीने वेगळी निवडणूक लढवू. कॉंग्रेसने प्रस्ताव दिला तर विचार करू. प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना फसवून आरएसएसचे काम सुरु केले आहे. असे लक्ष्मण माने म्हणाले होते.