पुणे बहुजननामा ऑनलाईन – विकत घेतलेल्या भुखंडाची सातबारा नोंद करण्याचे तहसीलदारांनी आदेश दिलेले असतानाही संगनमत करून विरोधात निकाल देत मिळकत त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांरित केली. त्यानंतर या निकालाविरोघात अपील करूनसुद्धा तेरा वर्षांनंतरही निर्णय न दिल्याने पौडचे तत्कालीन नायब तहसीलदार, आणि हिंजवडीचे तत्कालीन गावतलाठी यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तत्कालीन नायब तहसीलदार एन. बी. धनगर, आणि तत्कालीन तलाठी स. न. खिरीड यांच्यासह यशवंत बापू सावंत (रा. भोईर कॉलनी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर शशिकांत विश्वनाथ भोसले (वय ५३, रा. येरवडा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले यांनी १९९७ साली हिंजवडी येथे ६.५७ गुंठे एवढे क्षेत्र कायदेशीर बाबींची पुर्तता करून खरेदी केली होती. त्याची सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्याचे आदेश तत्कालीन तहसीलदार यांनी दिले होते. असे असतानाही नायब तहसीलदार धनगर आणि तलाठी खिराड यांनी राहूल वाघमारे या व्यक्तीने हरकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर आपापसात संगनमत करून वाघमारे यांच्या पुर्वीच्या अर्जावर खाडाखोड करून त्याआधारे तत्कालीन नायब तहसीलदार धनगर यांनी चौकशी करून यशवंत सावंत यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर भोसले यांनी खरेदी केलेली मिळवत यशवंत सावंत यांच्या नावावर संगनमताने हस्तांतरित केली. नायब तहसीलदार यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात भोसले यांनी अपील केले तरीही १३ वर्षांनंतरही त्यावर निर्णय देण्यात आला नाही. त्यामुळे भोसले यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून परिमंडल दोनचे सहायक पोलीस आय़ुक्त श्रीकांत मोहिते तपास करत आहेत.