पुणे : बहुजननामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या तुलनेने कमी झाली आहे. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यताही कमी असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून निधी मागणार असल्याची माहिती टोपे यांनी यावेळी दिली.
साथी, युनायटेड नर्सेस असोसिएशन महाराष्ट्र, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन आणि जन आरोग्य अभियानच्या वतीने परिचारिका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर आयोजित वेबिनारमध्ये मंत्री टोपे बोलत होते. या वेबिनारमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, प्रवीण महादळकर, डॉ. अभय शुक्ला, डॉ. संगीता भुजबळ, सुमन टिळेकर, स्वाती राणे, शकुंतला भालेराव आदींनी सहभाग घेतला होता.