बहुजननामा ऑनलाईन टीम – इराणने भारताला मोठा झटका दिला असून चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्याच्या प्रकल्पातून बाहेर काढले आहे. यावरुन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली. आपली ताकद आणि सन्मान गमावत असल्याचेही म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.
भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झाली आहेत. प्रत्येक ठिकाणी आपली ताकद आणि सन्मान गमावत आहोत. भारत सरकारला काय करायचे याची काहीच कल्पना नाही.अशी टीका त्यांनी केली आहे. चाबहार ते जाहेदानपर्यंत रेल्वे मार्ग उभारण्यासाठी करार करण्यात आल्यानंतर चार वर्षांनी इराणने भारताला या प्रकल्पातून बाहेर काढले आहे.
अफगाणिस्तान सीमारेषेलगत हा रेल्वे मार्ग उभारला जाणार होता. भारताकडून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी निधी मिळण्यास विलंब होत असल्याचे इराण सरकारने सांगितले आहे. इराणने आता स्वत:च हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.