बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये दुय्यम मानली जाणारी कॉंग्रेसची शक्ती प्रखर करण्यासाठी उपमुख्यमंत्रिपद आणि काही महत्त्वाची खाती आम्हाला सोपवा, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे समजते. त्यानुसार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात नवे उपमुख्यमंत्री होतील. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यास रिक्त होणाारे पद सेनेला सोडण्याची तयारी कॉंग्रेसने दर्शवली आहे. महत्त्वाचे पद मिळणार असल्याने शिवसेना या प्रस्तावाला अनुकूल असल्याचे समजते. असे झाल्यास ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातही काही फेरबदल होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कोणताही विशेष अधिकार नसलेले उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून अध्यक्षासारख्या महत्त्वाच्या पदावर तुळशीपत्र ठेवण्यास कॉंग्रेसमधील काही प्रमुख नेत्यानी विरोध केला आहे. भाजपने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही आमदार अपहरणाचे प्रयत्न केल्यास पक्षांतरबंदीचे सर्व कायदे राबवणारे अध्यक्षपद शिवसेनेकडे स्वत:हून सोपवणे योग्य नसल्याचे कॉंग्रेसमधील काही ज्येष्ठांचे मत आहे. शिवसेनेने मात्र या प्रस्तावावर चर्चा करायला हरकत नाही, अशी सावध भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने अध्यक्षपद आमच्याकडे येत असेल तर ते चांगलेच नाही का, अशी टिप्पणी जोडत तशी वेळ आल्यास महाविकास आघाडीच्या समन्वय बैठकीत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले आहे.
नव्या समीकरणांनुसार विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसऐवजी शिवसेनेकडे गेले तर महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला ते मान्य होईल काय, याचा अंदाजही शिवसेना आणि कॉंग्रेसतर्फे घेतला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे.
दरम्यान आज कॉंग्रेसचे काही महत्त्वाचे नेते दिल्लीत पोहोचले असून पक्षनेते राहुल गांधी यांनी मान्यता देताच पटोले यांच्या नावाची घोषणा कुठल्याही क्षणी होईल, असे सांगण्यात येत आहे. नवा अध्यक्ष नेमतानाच पाच कार्याध्यक्षांची नावेही घोषित होऊ शकतात असे बोलले जात आहे.