मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनानंतर राज्याचे अर्थचक्र पुरते कोलमडले आहे. त्यातून थोडे सावरत असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लादण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसत आहे. त्यामुळे अर्थचक्र रुळावर आणण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून नाणार रिफायनरी सारखे प्रकल्प अत्यंत महत्वाचे आहेत.
अशी गुंतवणूक राज्याबाहेर जाता कामा नये, असे म्हंटले आहे. दरम्यान, या पत्रावरून स्थानिकांच्या विरोधामुळे आम्ही तेथून प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता कोण स्वागत करत असेल तर ते करू शकतात असा टोला राज ठाकरे याना लगावत रिफायनरीला नाणारऐवजी दुसरी पर्यारी जागा देणार आहे. मात्र, हा प्रकल्प राज्याबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे.
सोमवारी नाणार येथील रहिवाशांचे आणि समाजसेवी संस्थेच्या शिष्टमंडळाने सोमवारी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत मी पत्राद्वारे मांडलेली भूमिका अत्यंत योग्य असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः आपल्याला फोनवर सांगितले आहे. ते स्वतः कदाचित या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, असा खुलासा त्यांनी केला.
नोटबंदी पासून ते आता कोरोना यामुळे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार बुडाले आहेत.
सध्याच्या परिस्थितीत नाणारसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाता कामा नयेत. मात्र, अशा प्रकल्पातून तयार होणारा रोजगार स्थानिकांच्या आणि मराठी माणसांना मिळायला हवा. यासाठी सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.कोकणात पर्यटनावर आधारित रोजगारनिर्मिती करायला हवी असेही ते म्हणाले.
यासर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना नाणार प्रकल्पाच्या भूमिकेवरून टोला लगावला आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प तेथून हटविण्यात आला आहे. आम्हाला वाटते म्हणून एखाद्या उद्योगाला विरोध किंवा पाठिंबा देत नाही. आता कोणाला स्वागत करायचे असेल, तर ते करू शकतात, असा टोला राज ठाकरे यांना लगावला.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागत केले असून राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. नाणार प्रकल्पासंदर्भात अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. शिवाय, नाणार येथील प्रस्तावित प्रकल्प ही ग्रीन रिफायनरी आहे. नाणार प्रकल्प हा राजकीय मुद्दा नाही त्यामुळे शिवसेनेचे नेतेही नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं.