मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मनसुख हिरेन प्रकरणावरून अधिवेशनात भाजपने आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्र्यांसह अनेकांवर जोरदार हल्ला केला. यावेळी अधिवेशनात सचिन वाझेंचा मुद्दा अधिक चर्चेत राहिला. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणावर आपली भूमिका मांडताना विरोधकांना सुनावलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत स्फोटकं सापडली होती, त्याचाही तपास सुरू आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा ही पद्धत योग्य नाही. सध्या ही पद्धत काही जणांनी सुरू केली आहे. सर्व तक्रारींची दखल आम्ही घेत आहोत. नवीन पद्धत आली आहे की, एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याचे
धिंडवडे काढायचे. हे चुकीचं आहे. सचिन वाझे कधीतरी शिवसेनेत होते, मात्र त्यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही. सचिन वाझे आमचा कोणी नेता किंवा मंत्री नव्हता. मृत्यू झाल्यानंतर त्याची दखल घेणं हे सरकारचं काम आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर तपास
सुरू आहे.
तपासाला दिशा देण्याचं काम कुणी करू नये
मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. त्याआधी त्यांनी सुसाइड नोट लिहिली. त्यात काही जणांची नावं आहेत. आता तपास सुरू झाला आहे. डेलकरांच्या बाबतीत तर तेथील स्थानिक पदाधिकारी भाजपच्या कार्यकाळात मंत्री होते. जिलेटिन कांड्यांचादेखील तपास सुरू झाला आहे. आधी फाशी द्या आणि नंतर तपास करा ही पद्धत होणार नाही. तपासाला दिशा देण्याचं काम कुणी करू नये. त्यांनी यापूर्वीदेखील सरकार चालवलं आहे. त्यांना हे माहीत आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं.