मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई करावी. लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, अशा आक्रमक शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाव्य लॉकडाऊनविषयी भाष्य केले आहे.
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केले. तसेच प्रशासनाला काही सूचना केल्या आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा. एकेका रुग्णांचे किमान 20 तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. सर्व काही व्यवहार सुरू झाले आहेत, निर्बंध शिथिल केले आहेत त्यामुळे तरुण वर्ग घराबाहेर पडला आहे. परिणामी आपल्याच घरातील वृद्ध व ज्येष्ठांना आपण धोक्यात आणत आहोत. मधल्या काळात आपण माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून राज्याचा आरोग्य नकाशा तयार केला. यातील सह व्याधी रुग्णांची परत आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारपूस सुरु करावी. तसेच ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठविण्यासाठी आपल्याकडे आल्या होत्या. त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या. जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा. ठिकठिकाणी उभारलेल्या फिल्ड हॉस्पिटलमधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू आहेत का याची खात्री करून घ्या, अशा सूचना यावेळी प्रशासनाला करण्यात आल्या आहेत.