अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एका पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न निर्माण केला आहे. राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसून ठाकरे सरकारचा हा निर्णय तकलादू आहे. निव्वळ शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आणखी कर्जात गुंतत असताना सातबारा कोरा झाला का, असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला आहे.
विदर्भ दौऱ्यावर असलेल्या शेट्टी यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधत असताना ते बोलत होते. एक लाखाच्या आत शून्य टक्के व दोन लाखांपर्यंतच्या कर्जावर डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी व्याज सवलत योजनेतून तीन टक्के व्याजाची आकारणी होते. यानंतरच्या रकमेवर शेतकऱ्यांना १२ ते १३ टक्के व्याज मोजावे लागते. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला का, असाही प्रश्न त्यांनी केला. तसेच आजही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून दररोज १० शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत, असे म्हणत हे चित्र निराशाजनक असल्याचे शेट्टी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी सध्या अत्यंत कठीण काळ असून दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती व ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसाने पश्चिम विदर्भातील खरिपाचा हंगाम उद्ध्वस्त झालाअसून रब्बीदेखील माघारला आहे. शेती पिकांच्या नुकसानीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची मागणी राज्यपालांकडे केली असता सत्तेत येताच त्यांना याचा विसर पडला. तसेच या सरकारद्वारे घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला. तर तूर, कापूस, सोयाबीन आदी शेतमालाला हमीभाव मिळत नाही. हमीभाव व प्रत्यक्ष विक्री झालेला दर यामधील तफावत शासनाने शेतकऱ्यांना द्यायला हवी आणि भ्रष्टाचार थांबून शासनाची पै न पै मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.