मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून परत एकदा वाद निर्माण झाला असून येणाऱ्या १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. तर एकीकडे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही तिथीचा हट्ट सोडा आणि १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करा, असे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून याचे आवाहन केले आहे. एका बाजूला शिवजयंतीची तारीख आणि त्यांच्या तिथीवरून वाद सुरु असतानाच विनायक मेटे यांनी शिवस्मारक प्रकल्प अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा दिल्याचेही बोलले जात आहे.
राष्ट्रवादी ची सत्ता आहे..
मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!
एकदा काय तो दोन शिव जयंती चा वाद मोडून टाकाच !!
एक शिव प्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे !
हीच ती वेळ !
जय शिवराय!!!— nitesh rane (@NiteshNRane) February 4, 2020
भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही शिवजयंतीवरून भाष्य केले आहे. राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग तर एकच शिवजयंती झाली पाहिजे. एकदा काय तो दोन शिवजयंतीचा वाद मोडून टाकाच. एक शिवप्रेमी म्हणून तुमच्या बरोबर आहे. हीच ती वेळ, जय शिवराय..असे म्हणत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही दिवस अगोदरच शिवाजी महाराजांचे वंशज व भाजपचे नेते उदयनराजे यांनीही शिवजयंतीवरून शिवसेनेला प्रश्न केला होता.