बहुजननामा ऑनलाईन – माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दोन दिवस स्थगित करावी होती. मात्र सोमवारी (ता.२६) जनतेला अभिवादन करत नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला पुन्हा सुरुवात झाली. पाथर्डीत झालेल्या सभेत त्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीवर निशाणा साधत विरोधकांनी काढलेल्या महापर्दाफाश यात्रेचा समाचार घेतला.
ते म्हणाले, तुम्ही काय करणार महापर्दाफाश, जनतेनेच तुमची पोलखोल केली आहे. राज्यातील आणि देशातील जनता आता मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही यात्रा काढल्या तरी पुढील किमान पंचवीस वर्षे जनता तुम्हाला सत्ता मिळू देणार नाही, असे फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सुनावले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेनंतर काँग्रेसने आजपासून महापर्दाफाश यात्रा सुरू केली. अमरावती येथील जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. सरकारला सांगली कोल्हापूरच्या महापूराची परिस्थिती हाताळता आली नाही. ज्या दिवशीत सांगली पाण्यात बुडत होती, ज्या दिवशी ब्रम्हणाळ्यात होडी बुडाली त्या दिवशी हे सरकार मौज मजा करत होत. हे सरकार घोषणा करण्यात पटाईत असून शेतकऱ्यांना अजुनही विमा मिळाला नाही. हे सरकार केवळ चार भांडवल दारांचं सरकार आहे. सगळे वाहन उद्योग मंदावले आहेत. मंदीचा विळखा वाढतोय. वस्त्रोद्योग डबघाईला गेला, मात्र सरकार काहीच करत नाही, असे आरोप त्यांनी यावेळी केले. तर मुख्यमंत्री कार्यालयातून दर महिन्याला ५० कोटी रुपये संघ कार्यकर्त्यांवर खर्च केले जात आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याप्रसंगी फडणवीस यांच्यावर केला.