बीड : बहुजननामा ऑनलाईन – छत्रपतींच्या विचाराने आणि ताकदीने चालणारा एकही मावळा शरद पवार साहेबांना सोडून जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, काही जण ईडीला घाबरून गेले, काहीजण बेडीला घाबरून गेले. तर काहीजण सीडीला घाबरून गेले. धनंजय मुंडे यांनी सुचवलेल्या सीडी शब्दानंतर एकच हशा पिकला. ज्यांचा घोटाळा असेल तो जातोय असेही पाटील म्हणाले. बीडमधील शिवस्वराज्य यात्रेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “राष्ट्रवादी सोडून जे जे नेते गेले त्यांच्या भानगडी विधानसभा निवडणुकीत सांगतो. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमुळे राष्ट्रवादी स्वच्छ व्हायला लागला आहे. घाबरट लोकांपेक्षा तरुण लोक राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांना सोबत घेऊन पवार साहेबांच्या विचारातून नवीन महाराष्ट्र घडवू. संदीप क्षीरसागर यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहा.” असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोर मिटकरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबुब शेख, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते. याशिवाय इतर हजारो लोकांचा या यात्रेत सहभाग होता.