पुणे (सासवड ) : बहुजननामा ऑनलाइन – एकीकडे जग जवळ येत असताना भारतात मात्र जाती जातीत तणाव आहे , गटा गटात माणसं विखुरली जात आहेत. माणूस एकमेकांपासून दूर जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानातील समता, स्वतंत्र, बंधुभाव, न्याय या संविंधनातिल तत्त्वा चा विसर सरकार ला पडू लागला आहे. त्यामुळेच नागरिकत्व सारखा कायदा या देशात येत आहे. तो पूर्णपणे भटक्या विमुक्त समाजाच्या विरोधातला आहे. असा आरोप आंबेडकर विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी केला. ते म्हणाले की, भटका समाज हा दर आठ दिवसाला आपले राहण्याचे ठिकाण बदलतो त्याला स्वत: चे जन्मगाव नाही, स्मशानभूमी नाही तो कायम भटकत असतो त्यांनी जन्माचा पुरावा कोठून आणायचा असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, माझ्या गावात उस्मानाबाद येथे आखिल भारतीय संमेलने झाले, मराठवाड्याला पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मी मिळवून दिला पण मला त्या संमेलनाला साधं निमंत्रण ही दिलं नाही अशी खंत व्यक्त केली. परंतु आचार्य अत्रे यांच्या पुण्यभूमी ने मला संमेलनाला बोलावून संमेनाध्यक्षपदाचा बहुमान दिला त्याबद्दल सासवड वासियांना मानाचा मुजरा करतो असे म्हणत सासवडवासियांचे आभार मानले.
मराठी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी विशेष तरतूद करणार – सुप्रिया सुळे
अलिकडच्या काळात सोशल मीडिया, टीव्ही यासारख्या विविध कारणाने वाचन संस्कृती लोप पावू लागली आहे.आताची मुले सुट्टीमध्ये मॉल ला जातात आम्ही ग्रंथालय, बागेमध्ये जायचो. वृत्तपत्र ही वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे वाचन संस्कृती टिकवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यासाठी व त्यासाठी विशेष तरतूद करण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या उद्धाटन पर भाषणात सांगितले. त्याबरोबरच संविधानाचे महत्त्व मुलांना समजावे यासाठी सर्व शाळांमध्ये उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या की, राजकीय लोकांकडून काही चुका झाल्यास त्यांना सावध करण्याचा हक्क साहित्यिकांना आहे. आणि तो त्यांनी बजावला पाहिजे.
या संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला पुरस्कार कॉपी चित्रपटाचे दिग्दर्शक दयासागर वानखेडे यांना तर पत्रकारिता पुरस्कार योगेश बोरसे यांना तर सामाजिक पुरस्कार सुनील लोणकर यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी या संमेलनाचे संयोजक पंकज धीवार यांनी या संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका सांगितली .स्वागताध्यक्ष माजी जिल्हाधिकारी संभाजी झेंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी आखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. शशी राय, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, आमदार संजय जगताप, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय कोलते, माजी आमदार अशोक टेकावडे, संयोजक पंकज धिवार, स्वागताध्यक्ष संभाजी झेंडे उपस्थित होते.