नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात दोनच अपत्ये जन्माला घालण्याचा कायदा आपल्या सरकारने करायला हवा असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथे बोलताना व्यक्त केले होते. मात्र,आता या वक्तव्यावरून मोहन भागवत यांनी आज यू – टर्न घेतला आहे. दोन मुल जन्माला घालण्याच्या कायद्याबद्दल मी बोललो नाही. मी म्हणालो की, वाढती लोकसंख्या एक समस्या असून त्याचबरोबर एक चांगला स्त्रोत देखील आहे.
मात्र यासाठी सरकारने देशात लोकसंख्याबाबतीत एक धोरण तयार केले पाहिजे आणि मग ते अंमलात आणले पाहिजे असे भागवत म्हणाले. तर माझ्या बाबतीत प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या असल्याचे म्हणत, त्यांनी दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.
या वक्तव्यावरून विरोधक भागवतांवर चांगलेच आक्रमक झाले, याला उत्तर देताना भागवत म्हणाले की, काही लोकांनी आमची अशी काही प्रतिमा तयार केली आहे की, यांचा पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याबद्दल असणार आहे. तर अनकेदा असे प्रसंग आले की, विरोधकांना वाटत होते संघ संपणार आहे, मात्र असे सांगणारे स्वता: चं संपले असल्याचे भागवत यावेळी म्हणाले. आम्हाला कुणाला पराभूत करायचं नसून आमचे कुणीही शत्रू नाही. सर्व लोक आपलेच असल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितले. मात्र या वक्तव्यातून मोहन भागवतांचा यू – टर्न सर्वांच्या समोर आला आहे.