मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अक्षरशः पानिपत झाले त्यानंतर विविध राज्यांमध्ये अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत, दरम्यान, महाराष्ट्रातही काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले आहे. मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्याबरोबर कोण जाईल असे वाटत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका टाळून येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. याबाबत अशोक चव्हाण यांनी सांगितले की, पराभवाची समीक्षा करण्यासाठी मित्रपक्षांशी बोलण्याआधी पक्षातील लोकांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हानिहाय बैठक घेतली आहे. जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा ठिकाणी नैतिक जबाबदारी घेत जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत.
दरम्यान, आघाडी झाली तरी राष्ट्रवादीचे लोक खाली मतदारसंघात काँग्रेसला मदत करत नाहीत. उलट राष्ट्रवादीचे लोक भाजपला मदत करतात. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबर आघाडी नको, असा सूर बैठकीत उमटला. त्याऐवजी वंचित बहुजन बरोबर आघाडी करावी अशीही भूमिका मांडण्यात आली.