नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किरकोळ कारणावरुन सध्या घटस्फोट घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. पण आता घटस्फोट घेण्यापूर्वी विचार करायची वेळ पतीराजांवर येणार आहे. कारण जर घटस्फोट घेतला तर त्यांना त्यांच्या पगारातील ३० टक्के रक्कम पत्नीला द्यावी लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या संबंधात एक निकाल दिला आहे.
सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेल्या निरीक्षकाचे ७ मे २००६ रोजी परिचयातील एका तरुणींशी विवाह झाला. लग्नानंतर ५ महिन्यातच त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हा पतीने पोटगी म्हणून पगाराच्या ३० टक्के रक्कम देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिले होते. त्याविरोधात पतीने सत्र न्यायालयात अपिल केले. तेव्हा सत्र न्यायालयाने पोटगीची रक्कम ३० टक्क्यांवरुन १५ टक्के इतकी कमी केली.
त्याविरुद्ध त्याच्या पत्नीने उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने पतीच्या एकूण पगाराच्या एक तृतीयांश भाग पत्नीला पोटगीच्या रुपात दिला जावा, असा निकाल दिला आहे. पतीवर कुटुंबातील आणखी कोणी सदस्य अवलंबून नसल्यास, पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडे राहतील तर एक हिस्सा पत्नीला द्यावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता घटस्फोट घेण्यापूर्वी आपल्याला किती पोटगी द्यावी लागेल, याचा विचार पतीने करायची वेळ आली आहे.