धुळे बहुजननामा ऑनलाइन – भाजप पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत ही महाजनादेश यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात येत आहे. धुळे येथील यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावला आहे. आम्ही यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्ष विविध यात्रांचे बिगुल फुंकण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरंतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. विरोधात असताना देखील आम्ही संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. या महाजनादेश यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास लोकांच्या मनात दिसून येत आहे.’
”राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे सर्वाना माहीतच आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहित नाही,” असा विरोधकांनी सुरू केलेल्या विविध यात्रांची परिस्थिती मांडून मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला लगावला दरम्यान, राज्यात लोकांचा कल भाजपसाठी अनुकूल आहे. त्यामुळे आम्हाला बहुमत मिळेल आणि राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी धुळे जिल्ह्यात केलेल्या विविध विकासकामांचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती होत असून, सर्व ठिकाणी राज्याचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Day-8Interacting with media on #MahaJanadeshYatra in Dhule https://t.co/8SrufqdEUS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2019