बहुजननामा ऑनलाइन टीम – येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची (unseasonal rain )शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील सर्वच भागांत रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी १९ आणि २० नोव्हेंबरला मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यात थंडी पडली होती. परंतु दिवाळीच्या तोंडावर थंडी गायब झाली. तसेच ढगाळ वातावरणामध्येदेखील वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत सर्वत्र रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. परिणामी थंडी गायब झाली आहे. राज्यात ८ ते १३ अंश सेल्सिअसदरम्यान खाली आलेला पारा आता १७ ते २० अंशांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अरबी समुद्राच्या दक्षिण-पश्चिम आणि पूर्व भागात सध्या वाऱ्यांची चक्रीय स्थिती असून, कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या पट्ट्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्यानंतर विदर्भ मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.