परभणी : बहुजननामा ऑनलाइन – चौकीदार चोर आहे, पहारेकरी चोर आहेत, असे आरोप नियमितपणे केले जातात आणि दुसरीकडे त्यांच्याच मांडीला मांडी लावून का बसतात? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव घेवून उपस्थित केला.
शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बहुजन जागृती समता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आ.बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी खासदार सुरेश जाधव, आ.विजय भांबळे, आ.रामराव वडकुते, महापौर मीना वरपूडकर, माजी महापौर प्रताप देशमुख, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला राठोड, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्षा भावना नखाते, मीना राऊत, स्वराजसिंह परिहार, आयोजक चक्रधर उगले, अनिल गोरे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक चक्रधर उगले यांनी केले.
या मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ यांनी केंद्र व राज्यातील भाजपा सरकारवर चौफेर टीका केली. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधून झाल्यानंतर मागील सहा वर्षांपासून त्याचा वापरही सुरू झाला असून या सरकारने सदर कंत्राटदाराला अद्यापही एक नवा रूपया दिला नाही. असे असताना दुसरीकडे याच प्रकरणात साडेआठशे कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी दहा महिने आपणास कारागृहात डांबले. सतरा-सतरा वेळा घरी येवून छापे टाकले. अंगावरील कपडे वगळता सर्व काही जप्त केले, असे सांगत त्यावेळच्या आठवणींना उजाळा देत भुजबळ भावूकही झाली. कविता व शायरी यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना मांडल्या.
केंद्र आणि राज्यातील सरकार समतेचे चक्र उलटे फिरवित आहे. हे चक्र पुन्हा मजबुतीने गतीमान करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुरोहितांना पाच हजार रूपयांत मानधन देतात, तर शेतकऱ्यांना देखील मानधन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी. मुस्लिमांना पाकिस्तानचा रस्ता धरा असे म्हणणाऱ्यांनी मुस्लिमांचे देशाच्या जडणघडणीत असलेले योगदान लक्षात घ्यावे, असेही भुजबळ म्हणाले.