नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. यावरून कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Modi) आणि मोदी(Modi) सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतले नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचेही ते म्हणाले. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींच्या या आरोपाला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी देशातील जनतेसोबत कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहेत. मोदींच्या या प्रयत्नांबद्दल गांधी नौटंकी हा शब्दप्रयोग करतात, हा देशाचा अन् देशातील जनतेचा अपमान आहे. आम्ही त्यांच्यासाठी नौटंकी हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण त्यांची नौटंकी जनतेने केव्हाच बंद केले असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे.
राहुल गांधीचे विधान पाहिल्यानंतर एक बाब अधोरेखित झाली, ती म्हणजे टूलकीट तुम्हीच निर्माण केले आहे. ज्यापद्धतीच्या भाषेचा वापर, तर्क आणि लोकांमध्ये भीती पसरविण्याचा प्रयत्न, हा त्याच राजकारणाचा भाग असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. आम्ही केंद्र सरकारला कोरोनाबाबत वारंवार आठवण करुन दिली होती. त्यानंतरही, कोविडविरुद्धच्या लढाईत भारताने विजय मिळवल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला होता. कोरोना हा तोंड वर काढणारा आजार आहे, यावर लॉकडाऊन आणि मास्क हा तात्पुरता उपाय आहे. केवळ लसीकरण हाच या आजारावरील कामयस्वरुपीचा उपाय असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.